हिंगोली : येथील एबीएम इंग्लिश हायस्कूल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व व सत्र न्यायालयास भेट देवून न्यायालयीन प्रक्रियेची चाकोरी जाणून घेतली. यात एकाने तर जजसाहेब, तुम्ही राजकीय दबावात येवून निर्णय देता का? असा थेट सवाल केला. एबीएम शाळेची क्षेत्रभेट जिल्हा न्यायालयात झाली. विद्यार्थ्यांच्या मनात न्यायालयीन प्रक्रियेविषयी मोठे कुतुहल असल्याचे पहायला मिळाले. शिवाय ही प्रक्रिया कशी चालते? न्यायधीशांची निवड कशी होते? आदी प्रश्नही त्यांना पडले होते. समर्थ मुसळे याने तर राजकीय दबावात येवून निर्णय देता का? असा सवाल केला. त्यावर न्यायाधीशांनी कायदेशीर बाबींच्या आधारावर केवळ न्याय्य निर्णय देतो. उलट कोणी पुढारी चुकला तर त्याच्यावर कारवाईचा अधिकार आम्हाला असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायाधीश बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? असा प्रश्न वीरा भारुकाने विचारला. यात वकीलीचा अभ्यासक्रम केल्यानंतर न्यायाधीश होण्यासाठी स्वतंत्र परीक्षा होते, असे न्यायाधीशांनी सांगितले. तर नेतल अग्रवाल हिने एखाद्या केसचा निकाल लागायला किती वेळ लागतो? असे विचारले त्यावर केसचे महत्त्व व तिचा पाठपुरावा कसा होतो? यावर निकालाचा वेळ ठरतो, असे न्यायाधीशांनी सांगितले. तर ईश्वरी सूर्यवंशीने लिगल एड म्हणजे काय? याची विचारणा केली. त्यावर कोणी गरीब असेल तर त्याला निशुल्क वकील पुरवला जातो, मात्र तो त्यांच्या मनाप्रमाणे दिला जात नाही, असे स्पष्ट केले. केस ट्रायलमध्ये कशी जाते? अशी विचारणा केल्यावर पोलिसांकडून आलेले दोषारोप व त्यावर अभ्यास करून केस ट्रायलला जाते, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. या वेळी दिलीप बांगर, जोसेफ सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक नितीन शिंदे, संदिप सर, पायल सोनी मॅडम ह्यांनी पूर्ण कार्यक्रम व्यवस्थीत नियोजन करून पार पाडला.